मुंबई(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : शिर्डी येथील ग्रामस्थांनी बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर आज येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी झाली. पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला औरंगाबाद येथील बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर या विकास आराखड्यास हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी बैठकीत जाहीर केले.
शिर्डी ग्रामस्थांची भूमिका मांडताना साईभक्तांच्या भावना लक्षात घेऊन बंद पाळला. यापूर्वी जन्मस्थळाबाबत शासनाची कुठलीच भूमिका नव्हती, अशीच भूमिका आता असावी असा मुद्दा आमदार श्री. विखे- पाटील यांनी यावेळी मांडला.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, ग्रामस्थांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत आपण पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भागाचा देखील विकास व्हावा, अशी भूमिका आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री, महसुल मंत्री यांचा शिर्डी संस्थान व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
येथील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात,खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील,शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.