ताडोबात सर्वाधिक वाघ, नागपूरचे टायगर कॅपीटल म्हणून वाढते नाव
चंद्रपूर (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशांमध्ये 2 हजार 967 वाघ असल्याचे जाहीर केले आहे. आज जागतिक व्याघ्र दिनाला वन्यजीव, वनांवर प्रेम करणाऱ्या निसर्ग प्रेमींच्या साक्षीने पराक्रमाच्या गाथा लिहिणाऱ्या महाराष्ट्राची ओळख पराक्रमी वाघांचा प्रदेश म्हणून व्हावी यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राज्याचे वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी आज येथे केले. वन्यजीव, वृक्ष लागवड, व्याघ्र संवर्धन करणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थित वनविभागाच्या विविध पुरस्कार मान्यवरांना बहाल करताना ते बोलत होते.
चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहांमध्ये आज जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्ताने अभिमान महाराष्ट्राचा हा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ताडोबा राज्यांमध्ये सर्वाधिक वाघांचा प्रदेश व या प्रदेशात आलेल्या महाराष्ट्रातील विविध भागातील वनावर प्रेम करणाऱ्या मान्यवरांना यावेळी वन राज्यमंत्री परिणय फुके यांनी संबोधित केले. राज्याचे वित्त,नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही.
आजच्या कार्यक्रमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2017 व संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत उत्कृष्ट गावांना देखील पुरस्कार देण्यात आला. याशिवाय वन विभागातर्फे आयोजित विविध पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, आमदार नानाभाऊ शामकुळे, पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे,महापौर अंजलीताई घोटेकर, वनविभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वन संरक्षक यु.के. अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, वनविभागाचे व्यवस्थापकीय संचालक रामबाबू, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव, प्रधान मुख्य वनसंरक्षक साईप्रकाश,अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर,चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस. वि.रामाराव,जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले आदींची उपस्थिती होती.
यावेळी संबोधित करताना परिणय फुके यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व्याघ्र संवर्धन संदर्भात सुरू झालेल्या अभियानाला भारतात उत्तम प्रतिसाद मिळत असून यासाठी भारताचे कौतुक जागतिक स्तरावर होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील व्याघ्र संवर्धन संदर्भात महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले असून महाराष्ट्रात आजमितीला 312 वाघ आहेत. भारतात ही संख्या 2967 आहे. सर्वाधिक नागपूर परिसरात वाघ असून देशाचे टायगर कॅपिटल म्हणून नागपूरला यापुढे नाव लौकिक मिळावा, असे काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.